साधारण १५-१६ वर्षांपूर्वी मला एका मुलीचा फोन आला, 'श्रेयसी वझे' नावाच्या आणि तिने
मला सांगितलं की ती संत ज्ञानेश्वरांच्या रचनांवर आधारित 'ओम नमो जी आद्या' हा
कार्यक्रम आयोजित करत आहे. त्या कार्यक्रमात मी गावं अशी तिची इच्छा होती. माझी आणि
तिची ती पहिलीच भेट होती. अर्थातच पुढे जाऊन श्रेयसी माझी खूप चांगली मैत्रीण झाली. पण
सुरुवातीला कार्यक्रमाच्या तालमींना जेव्हा आम्ही भेटत होतो तेव्हा एक गोष्ट मला
प्रकर्षाने जाणवली; ती म्हणजे इतर ज्या अनेक कार्यक्रमात आम्ही सहभागी होत होतो
त्यापेक्षा हा कार्यक्रम मुख्यतः २ गोष्टींसाठी वेगळा असणार होता. कार्यक्रमाचं
सादरीकरण आणि रंगमंच्याची रचना या दोन्ही गोष्टी नाविन्यपूर्ण तर होत्याच पण त्यावर
विशेष विचार करून मेहेनत घेतल्याचं जाणवत होतं. कार्यक्रम अनेक जण करत असतात, पण
त्यातले मोजकेच असे असतात की ज्यांना काही खास कॉन्टेन्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे,
त्या निवडक लोकांपैकी श्रेयसी मला एक वाटली.
रंगमंचावर ज्ञानेश्वरांचा ध्यानस्थ कट-आउट तसंच वारकरी, पंढरपूर, संतमेळा, विठुराया
यांची मोठमोठी हस्तचित्रं यांनी रंगमंच अतिशय देखणा दिसायचा. या सौंदर्यात मंद
तेवणाऱ्या अनेक पणत्या भर घालायच्या. गाणी आणि निवेदनाबरोबरच कार्यक्रमातल्या या गोष्टी
नक्कीच भुरळ घालणाऱ्या होत्या. कार्यक्रमाचं निवेदन स्वतः श्रेयसी आणि तिचे वडील असे
दोघे करत होते. श्रेयसी जरी या क्षेत्रात तेव्हा नवखी असली तरी तिचा अभ्यास, वाचन हे
निवेदनातून जाणवत होतं.
आता गेली अनेक वर्षे श्रेयसी कार्यक्रम आयोजित करत आहे, इतर
अनेक कार्यक्रमाचं निवेदन करत आहे...पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्या
पहिल्याच कार्यक्रमात मला जाणवलं होतं की या क्षेत्रातील हिची वाटचाल उज्वल आहे.
प्रत्येक कार्यक्रमातून आपण वेगळं काय देऊ शकू याची जाणीव ठेवून कार्यक्रमाची आखणी करणं
ही कला मला तिच्यात जाणवते. त्यासाठी पूर्ण मेहेनत घेण्याची तिची तयारी असते. 'ओम नमो
जी आद्या'कार्यक्रमाच्या माझ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि माझ्या नोस्टॉजियाचा भाग
आहेत. यापुढेही तिने असाच एखादा कार्यक्रम आखावा आणि त्याचा मी एक भाग असावं असं मला
वाटतं. श्रेयसीला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
अजित परब
(गायक, संगीतकार)